Skip to main content

गवळी मोहल्ल्यात ड्रेनेज ओव्हरफ्लोचा त्रास; नागरिक संतप्त, महाबळेश्वर नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

गवळी मोहल्ल्यात ड्रेनेज ओव्हरफ्लोचा त्रास; नागरिक संतप्त, महाबळेश्वर नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

मिलिंद काळे– महाबळेश्वर प्रतिनिधी 

महाबळेश्वर :
शहराच्या मध्यवर्ती भागात गेल्या पंधरा दिवसांपासून ड्रेनेज ओव्हरफ्लो होऊन संपूर्ण परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे. “स्वच्छ महाबळेश्वर – सुंदर महाबळेश्वर” हा नारा केवळ मुख्य बाजारपेठेपुरता मर्यादित आहे का, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. गवळी मोहल्ल्यातील अस्लम बेपारी यांच्या घराशेजारील ड्रेनेज लाईन फुटल्याने घाणीचे पाणी रस्त्यावर वाहू लागले असून, संपूर्ण परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांनी या संदर्भात महाबळेश्वर नगरपालिका कार्यालयात जाऊन तोंडी तक्रार केली. तसेच वारंवार फोनद्वारे संपर्क साधून देखील संबंधित अधिकाऱ्यांकडून “आज करतो”, “उद्या करतो” अशा आश्वासनांपलीकडे काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वारंवार फोन येत असल्याने नगरपालिकेचे मुकादम मनोज चव्हाण यांनी आता फोन उचलणेच बंद केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष वाढला असून, आता या प्रकरणाची तक्रार मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्याकडे करण्याची तयारी सुरू आहे.

ड्रेनेज ओव्हरफ्लो झालेल्या जागेजवळच नगरपालिका संचालित मुलांची शाळा क्रमांक १ आणि मुलींची शाळा क्रमांक २ आहेत. शेजारील वस्ती दाट असून, दुर्गंधीमुळे नागरिकांचा श्वास घेणेदेखील कठीण झाले आहे. सतत साचलेले घाणीचे पाणी आणि वाहणारे ड्रेनेज यामुळे परिसरात माशा, डास यांचा त्रास वाढला असून, लहान मुले आजारी पडू लागली आहेत. नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांचा संताप वाढला आहे.

या घाणीच्या साम्राज्यामुळे परिसरात रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेने तातडीने या ठिकाणी स्वच्छता करून ड्रेनेज दुरुस्त करावे, तसेच मुकादम मनोज चव्हाण यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

नागरिकांच्या तक्रारीवर महाबळेश्वर नगरपालिकेने तत्काळ लक्ष देऊन प्रत्यक्ष कारवाई न केल्यास, येत्या काही दिवसांत नागरिक आंदोलनाचा इशारा देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Comments

Popular posts from this blog

राज्यपालांच्या स्वागतासाठी ‘चिखलाच्या पायघड्या’

राज्यपालांच्या स्वागतासाठी ‘चिखलाच्या पायघड्या’ ऑर्थर सीट रस्त्याची दुरवस्था; वाहतूक कोंडीने पर्यटक त्रस्त जितेंद्र कारंडे ,  प्रतापगड प्रतिनिधी – महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या महाबळेश्वर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाच्या तयारीवर गंभीर सवाल उपस्थित होत आहेत. महाबळेश्वरमधील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी असलेल्या ‘ऑर्थर सीट पॉइंट’कडे जाणारा रस्ता अनेक महिन्यांपासून खड्ड्यांनी भरलेला असून, पावसाळ्यामुळे रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. राज्यपाल येण्यापूर्वी प्रशासनाने घाईघाईत रस्त्यावर माती टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. मात्र या तात्पुरत्या डागडुजीमुळे रस्त्याचे चिखलात रूपांतर झाले. परिणामी राज्यपालांनाच या चिखलातून मार्गक्रमण करावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या भाषेत, राज्यपालांच्या स्वागतासाठी प्रशासनाने ‘चिखलाच्या पायघड्या’च घातल्या! पर्यटनस्थळाची प्रतिमा मलिन महाबळेश्वर हे राष्ट्र आणि जगभरातून पर्यटकांना आकर्षित करणारे हिलस्टेशन. अशा ठिकाणाचा मुख्य पर्यटन मार्गच दुरवस्थेत असेल तर पर्यटन विकासाची ...

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप   तापोळा – प्रतिनिधी महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट गावात आज सकाळी झालेल्या रानगव्याच्या प्रचंड हल्ल्यात राघू जानू कदम (वय अंदाजे ५०) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या दुःखद घटनेमुळे परिसरात भीतीचे तसेच वनविभागाच्या निष्क्रिय कारभाराबद्दल तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राघू कदम हे दररोजप्रमाणे सकाळी आपल्या शेतात शेतीची कामे करण्यासाठी गेले होते. दुपारी ते परत न आल्याने काही नागरिकांनी शेतात जाऊन पाहणी केली असता, त्यांना राघू कदम शेतात मृत अवस्थेत आढळले. प्राथमिक तपासात रानगव्याने अचानक हल्ला करून जोरदार धडक दिल्याने त्यांच्या छातीत शिंग आरपार गेल्याचे समोर आले आहे. हल्ला इतका भीषण होता की घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तापोळा पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. मात्र, या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्य...

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?”

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?” सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे मेटतळे येथील सर्वे क्रमांक ११/१० या मिळकतीमध्ये वनसंपदा नष्ट करण्याचा प्रकार उघडकीस आल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. संबंधित मिळकतधारकाने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता जंगलातून रस्ता काढल्याचे समोर आले असून, यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची माहिती संबंधित गावकामगार तलाठी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. मात्र, यानंतरही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. उलट संबंधित अधिकाऱ्यांनी “पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केला असून पुढील कारवाई तहसीलदारांच्या स्तरावर होणार आहे,” असे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचीही तक्रार आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण असून, वनक्षेत्रात बेकायदेशीर हस्तक्षेप होत असताना प्रशासन निष्क्रिय का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जंगलातील झ...