“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?”
सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे मेटतळे येथील सर्वे क्रमांक ११/१० या मिळकतीमध्ये वनसंपदा नष्ट करण्याचा प्रकार उघडकीस आल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. संबंधित मिळकतधारकाने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता जंगलातून रस्ता काढल्याचे समोर आले असून, यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची माहिती संबंधित गावकामगार तलाठी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. मात्र, यानंतरही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. उलट संबंधित अधिकाऱ्यांनी “पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केला असून पुढील कारवाई तहसीलदारांच्या स्तरावर होणार आहे,” असे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचीही तक्रार आहे.
या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण असून, वनक्षेत्रात बेकायदेशीर हस्तक्षेप होत असताना प्रशासन निष्क्रिय का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जंगलातील झाडांची तोड, मातीची हालचाल आणि नैसर्गिक रचनेत होणारे बदल यामुळे पर्यावरणीय संतुलन बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः महाबळेश्वरसारख्या संवेदनशील पर्यावरणीय पट्ट्यात अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते, असे जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, संबंधित प्रकरणी तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच बेकायदेशीर रस्ता त्वरित बंद करून वनक्षेत्राचे संरक्षण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. “वनसंपदा ही सार्वजनिक संपत्ती असून तिचे रक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
आता या प्रकरणाची दखल घेऊन महसूल व वन विभागातील वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात, आणि प्रत्यक्षात कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment