घोगलवाडीत वन्यप्राण्याचा गाईवर हल्ला; शेतकऱ्याची दुभती गाय ठार, परिसरात भीतीचे वातावरण महाबळेश्वर, प्रतिनिधी : महाबळेश्वर तालुक्यातील घोगलवाडी येथे वन्यप्राण्याच्या हल्ल्यात एका गाईचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तातडीने पंचनामा करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घोगलवाडी येथील शेतकरी बबन धोंडू राजपुरे यांच्या गाईवर शनिवारी (काल) रात्री वन्यप्राण्याने हल्ला केला. या हल्ल्यात गाईचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला वाघ अथवा बिबट्याने केल्याचा संशय व्यक्त केला जात असला, तरी नेमका कोणत्या वन्यप्राण्याचा हल्ला होता, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. वन विभागाच्या तपासणीनंतरच याबाबत स्पष्टता येणार आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून रात्रीच्या वेळी जनावरे व शेतात जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्...