साखर सुतारवाडी व केवनाळे गावाच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती; मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आपली माती आपली माणसं या संघटनेच्या पुढाकाराने बैठक संपन्न
साखर सुतारवाडी व केवनाळे गावाच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती; मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक
आपली माती आपली माणसं या संघटनेच्या पुढाकाराने बैठक संपन्न
✍️ प्रकाश कदम,
पोलादपूर प्रतिनिधी :
पोलादपूर, दि. २९ ऑक्टोबर —
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावाच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत केवनाळे पुनर्वसन आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस रायगडचे खासदार सुनील तटकरे, रायगड-अलिबागचे जिल्हाधिकारी, मदत व पुनर्वसन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी व आपली माती आपली माणसं
संघटनेचे संस्थापक राज पार्टे, अध्यक्ष निलेश कोळसकर, कार्याध्यक्ष संजय उतेकर चंद्रकांत मोरे,अनिल मालुसरे, अजय सलागरे, तसेच पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत साखर सुतारवाडी व केवनाळे गावाच्या पुनर्वसनासाठी दरडग्रस्थाना प्राधान्याने राहण्यासाठी घरे बांधून द्यावीत या मागणी सह आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा — जसे की पाणीपुरवठा, वीज, रस्ते, शाळा, आरोग्यसेवा व सामुदायिक सुविधा — समावेश असलेला आराखडा तसेच बाधित ग्रामस्थांना तातडीने घरे उपलब्धता या मागण्या प्राधान्याने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
खासदार सुनील तटकरे यांनी या पुनर्वसनासाठी आवश्यक निधी, जमीन निवड, आणि आराखड्याची अंमलबजावणी यासंदर्भात सविस्तर चर्चा करत नागरिकांच्या मागण्या मान्य करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “दरडग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनात कोणतीही तडजोड होऊ देणार नाही. पायाभूत सुविधा ही पुनर्वसनाची गाभा आहेत आणि त्या प्राधान्याने पूर्ण केल्या जातील.”
जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पोलादपूर तालुक्यातील केवनाळे व सुतारवाडी या गावांवर भीषण दरड कोसळून ११ नागरिकांचा मृत्यू झाला, तर १३ जण जखमी झाले होते. त्याच काळात महाड तालुक्यातील तळिये गावात झालेल्या दरड दुर्घटनेत ४९ लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनांनी संपूर्ण रायगड जिल्हा हादरला होता.
दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनासाठी “आपली माती आपली माणसं” या सामाजिक संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला आहे. या संघटनेच्या वतीने केवनाळे आणि साखर सुतारवाडी पुनर्वसनाबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध आंदोलनं करण्यात आली. १५ ऑगस्ट रोजी झालेल्या आत्मदहन आंदोलनानंतर शासनाने या विषयावर गांभीर्याने लक्ष देत आता सकारात्मक पावले उचलली आहेत.
संघटनेचे संस्थापक राज पार्टे, अध्यक्ष निलेश कोळसकर, कार्याध्यक्ष संजय उतेकर,चंद्रकांत मोरे,अनिल मालुसरे, तसेच पदाधिकारी आणि मान्यवर यांच्या उपस्थितीत या चळवळीला सातत्य लाभले असून, पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळाल्याने गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
राज पार्टे यांनी या संदर्भात सांगितले की, “गेल्या काही वर्षांपासून केवनाळे व सुतारवाडी गावकरी विस्थापित अवस्थेत आहेत. शासनाने आता त्यांच्या पुनर्वसनाचा ठोस निर्णय घेतला आहे, हे आमच्यासाठी दिलासा देणारे पाऊल आहे. मात्र हा आराखडा प्रत्यक्षात उतरल्याशिवाय आमची लढाई थांबणार नाही.”
सरकारच्या पुढाकारामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून साखर सुतारवाडी व केवनाळे गावाचे पुनर्वसन आता प्रत्यक्षात आकार घेत असून, पाणीपुरवठा, वीज, रस्ते आणि इतर सुविधांना प्राधान्य देत पुनर्वसनाचे नवे पान लिहिले जाणार आहे.
---
Comments
Post a Comment