अखिल भारतीय आगरी साहित्य संस्थेचा “साहित्य संगम सोहळा” उत्साहात पार – आगरी संस्कृतीच्या जतनाचा संकल्प दृढ
अखिल भारतीय आगरी साहित्य संस्थेचा “साहित्य संगम सोहळा” उत्साहात पार – आगरी संस्कृतीच्या जतनाचा संकल्प दृढ
मिलिंद खारपाटील,
मांडला प्रतिनिधी :
अखिल भारतीय आगरी साहित्य संस्थेच्या वतीने आयोजित “साहित्य संगम सोहळा” अलिबाग तालुक्यातील मांडला येथील ग्रीन किंग रिसॉर्ट येथे रविवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी अत्यंत उत्साहात व साहित्यिक वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला महाराष्ट्रातील शेकडो आगरी साहित्यिक, कवी, लेखक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक अमृत पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अलिबाग नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा सौ. मानसी म्हात्रे, संस्थेचे अध्यक्ष कैलास पिंगळे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश भोपी, साहित्यिक चंद्रकांत पाटील, ‘आवाज महामुंबईचा’ चॅनेलचे संपादक मिलिंद खारपाटील, ॲड. राकेश पाटील आणि ज्येष्ठ पत्रकार धम्मशील सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वावे गावातील कलाकारांनी सादर केलेल्या गायन आणि भवर नृत्याने आगरी संस्कृतीचे समृद्ध दर्शन घडवले. त्यानंतर स्वागतपर भाषणात संस्थेचे अध्यक्ष कैलास पिंगळे यांनी “आगरी भाषा लोप पावणार नाही, एक आगरी लाखांना भारी” असा दृढ विश्वास व्यक्त करत आगरी संस्कृती आणि भाषेच्या जतनासाठी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.
आपल्या मनोगतात सौ. मानसी म्हात्रे म्हणाल्या, “आगरी भाषा जोमाने पुढे जात आहे. अनेक नवनवीन पुस्तके या भाषेत प्रकाशित होत आहेत. नवोदितांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविणे हे आपले कर्तव्य आहे. उच्च शिक्षण घेत साहित्य क्षेत्रात सक्रीय राहा, तुमच्या लेखणीतून आगरी समाजाचे वैभव जगासमोर यायला हवे.”
या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यामध्ये सुरेश भोपी, कृष्णा जोशी, मारुती बागडे, अरुण द. म्हात्रे, प्रा. संदेश पाटील, जयंत पाटील, विकास पाटील आणि चंद्रकांत कांडपिले या नामवंत व्यक्तींचा समावेश होता.
त्याचप्रमाणे समाजातील अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवणाऱ्या आणि महिलांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या सौ. मानसी म्हात्रे यांना ‘सरखेल पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.
सोहळ्याचा आणखी एक विशेष क्षण म्हणजे नंदेश गावंड यांच्या “आगरास्त्र” या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक आगरी समाजाच्या इतिहास, संस्कृती आणि ओळखीवर आधारित असून उपस्थितांनी या प्रकाशनाचे मनापासून कौतुक केले.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन तृप्ती गावंड यांनी ओघवत्या शैलीत केले, तर कार्यक्रमाची सांगता सुश्राव्य भजनाने करण्यात आली.
या साहित्य संगम सोहळ्याने आगरी साहित्यविश्वात नवा जोश निर्माण केला असून, आगरी भाषेच्या संवर्धनाचा आणि नव्या पिढीपर्यंत साहित्यप्रेम पोहोचवण्याचा संकल्प या वेळी सर्व उपस्थितांनी दृढ केला.
Comments
Post a Comment