मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान गावोगावी स्पर्धेची जय्यत तयारी
विजय जाधव
सातारा प्रतिनिधी
ग्रामविकासाचे नवे पर्व सुरू करण्यासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” अंतर्गत जिल्ह्यात गावोगावी स्पर्धात्मक तयारी सुरू झाली आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेले हे अभियान लोकसहभागातून गावागावात विकासाची नवी उभारी निर्माण करत आहे.
या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद सातारा, पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायती सज्ज झाल्या असून, “प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने सर्वोत्तम योगदान देऊन जिल्हा राज्यात अग्रेसर ठरवावा” असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी नुकत्याच झालेल्या ऑनलाईन बैठकीत केले.
ग्रामपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत नियोजन
या बैठकीत नागराजन यांनी स्पष्ट केले की, अभियानातील आठ प्रमुख घटक विषयांवर आधारित १०० गुणांच्या स्पर्धेत गावोगावी काटेकोर तयारी सुरू झाली आहे. या घटकांमध्ये –
शिक्षण,
आरोग्य,
पाणी,
उपजीविका,
कृषी,
रोजगार हमी योजना,
ग्रामपंचायत प्रशासन,
स्वच्छता व पाणीपुरवठा,
यांसह उमेद, बांधकाम विभाग व इतर सर्व विभागांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. ग्रामपंचायत स्तरापासून ते पंचायत समिती आणि जिल्हा पातळीपर्यंत नियोजनबद्ध अंमलबजावणी केल्यास जिल्हा निश्चितपणे राज्यात नावाजला जाईल, असे त्यांनी सांगितले.
सक्रिय सहभागाची अपेक्षा
सीईओ यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना उद्देशून सांगितले की, “गावाबरोबरच पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद या अभियानात अग्रेसर ठरणे आवश्यक आहे. यासाठी सर्व विभागांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. ग्रामपातळीवरील प्रत्येक कार्यकर्त्याचे योगदान या स्पर्धेत निर्णायक ठरणार आहे.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, प्रत्येक गावाने आपल्या क्षमतेनुसार विकास साधत स्पर्धेत गुण मिळवणे हे अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे जबाबदाऱ्या पार पाडताना प्रत्येकाने समर्पित वृत्तीने काम करावे.
बैठकीत व्यापक सहभाग
या ऑनलाईन मार्गदर्शन बैठकीस जिल्ह्यातील विविध स्तरांवरील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यामध्ये –
आरोग्य सेवक, आशा कार्यकर्त्या, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका व सेविका, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी, केंद्र चालक, ग्रामरोजगार सेवक, बचत गट कार्यकर्त्या आदींचा समावेश होता.
नवा महाराष्ट्र घडविण्याकडे वाटचाल
राज्यातील ६० दिवसांच्या दौऱ्यांद्वारे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे अभियान जनचळवळीचे रूप घेईल यासाठी प्रयत्नशील आहेत. ग्रामपातळीवर लोकसहभाग वाढत असून, प्रशासनाची साथ मिळाल्यास “नवा महाराष्ट्र” घडविण्याचे स्वप्न नक्कीच साकार होईल, असा विश्वास याशनी नागराजन यांनी व्यक्त केला.
Comments
Post a Comment