पोलादपूर प्रतिनिधी (प्रकाश कदम)
महसूल व वन विभागाकडून दि. 01 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान रायगड जिल्ह्यात आणि विशेषतः पोलादपूर तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती तहसीलदार कपिल घोरपडे यांनी दिली.
या कालावधीत सेवा पंधरवड्याचे उपक्रम तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहेत —
पहिला टप्पा (17 ते 22 सप्टेंबर 2025) — पाणंद रस्ते मोहिम
शिवारातील पाणंद/शेतरस्त्यांना क्रमांक देणे.
शासन निर्णय दि. 29 ऑगस्ट 2025 च्या अंमलबजावणीद्वारे सर्वेक्षण.
वाजिब उल अर्ज व निस्तार पत्रकात नसलेले रस्ते नोंदवणे.
शेतावर जाण्यासाठी संमतीपत्र घेऊन रस्त्यांची उपलब्धता निश्चित करणे.
रस्ता अदालत आयोजित करून प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे.
रस्त्यांची मोजणी, सीमांकन, छायाचित्रे घेणे व अतिक्रमण यादी तयार करणे.
गाव नकाशांनुसार वर्गीकरण करून उप अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे मॅपिंगसाठी सादर करणे.
अतिक्रमित रस्त्यांबाबत ग्रामसभेत ठराव घेऊन, मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 अन्वये सुनावणीद्वारे अतिक्रमण काढून टाकणे.
अतिक्रमणमुक्त रस्त्यांना सार्वजनिक रस्ते म्हणून नोंद देणे व त्यांना विशिष्ट सांकेतांक निश्चित करणे.
दुसरा टप्पा (23 ते 27 सप्टेंबर 2025) — सर्वांसाठी घरे उपक्रम
ग्रामीण व नागरी भागातील शासकीय जमिनीवरील (वन विभाग वगळता) निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करणे.
शासन निर्णय दि.16 फेब्रुवारी 2018, 17 नोव्हेंबर 2018 व 6 मार्च 2019 नुसार पात्र अतिक्रमणधारकांना पट्टे वाटप.
1 जानेवारी 2011 पर्यंत झालेल्या निवासी अतिक्रमणांची यादी निश्चित करणे.
अतिक्रमणधारकांकडून पुरावे व अर्ज घेऊन भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी करणे.
पात्र प्रकरणे समितीकडे पाठवून मंजूरी मिळाल्यानंतर सनद प्रदान करणे.
तिसरा टप्पा (28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025) — नाविन्यपूर्ण उपक्रम
100% Direct Benefit Transfer (DBT) ची अंमलबजावणी.
आयुष्मान भारत कार्डबाबत जनजागृती व शिबिरे.
अधिकारी/कर्मचारी सेवा पुस्तके संगणकीकृत करणे.
तृतीयपंथी नागरिकांची यादी तयार करून त्यांना ओळखपत्रे देणे.
आदिवासी समाजास तात्काळ जन्म व उत्पन्न प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणे.
महा-ई-सेवा केंद्रांची तपासणी, Feedback Register ठेवणे व QR Code द्वारे माहिती उपलब्ध करणे.
प्रत्येक गावाला स्मशानभूमी व प्रवेशरस्ता उपलब्ध करून देणे तसेच Geo Tagging करणे.
वीरमाता, वीरपत्नी, सैनिक व त्यांचे नातेवाईक यांच्या समस्या समजून घेऊन उपाययोजना करणे.
तालुक्यातील किमान एका शाळा/महाविद्यालयात सेतू केंद्र सुरू करणे.
तहसीलदार कपिल घोरपडे यांनी स्पष्ट केले की, सेवा पंधरवड्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय समित्या गठित करण्यात आल्या आहेत. उपक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर सविस्तर नियोजन करण्यात आले असून नागरिकांचा सक्रीय सहभाग अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
Comments
Post a Comment