पोलादपूर प्रतिनिधी (प्रकाश कदम):
पोलादपूर तालुक्यातील दाभिळ गावचे लढवय्या कार्यकर्ता, आदर्श शेतकरी व समाजसेवक हनुमंत दळवी यांच्या निधनाने देवळे विभागावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या जाण्याने राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्राला मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
शेतकरी ते आदर्श शेतकरी
शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे हनुमंत दळवी यांनी बालपणापासूनच संघर्षमय जीवनाचा सामना केला. कुटुंबाचा संपूर्ण भार आपल्या खांद्यावर घेत त्यांनी शेतीत विविध प्रयोग केले. दाभिळसारख्या दुर्गम भागात केळी व स्ट्रॉबेरी शेतीचा अभिनव प्रयोग करून त्यांनी गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले. त्यांच्या कार्यामुळे त्यांना आदर्श शेतकरी पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
राजकीय वाटचाल
दळवी यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात स्वर्गीय माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षातून झाली. काँग्रेसचे कट्टर समर्थक म्हणून त्यांनी शिवसेनेच्या सत्तेविरुद्ध ठामपणे उभे राहत देवळे विभागात काँग्रेस जिवंत ठेवली. नंतर गावाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने त्यांनी तत्कालीन आमदार भरत शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या कार्यामुळेच त्यांच्या चिरंजीव अनिल दळवी यांना शिवसेनेतून पंचायत समितीची उमेदवारी मिळाली. आज अनिल दळवी हे शिवसेनेचे सक्रिय व युवा कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
सामाजिक व सांस्कृतिक योगदान
हनुमंत दळवी हे फक्त शेतकरी व राजकारणी नव्हते, तर समाजमन जपणारे व्यक्तिमत्व होते. गावातील धार्मिक, सांस्कृतिक उपक्रमांत त्यांचा नेहमी पुढाकार असे. अलीकडेच दाभिळमध्ये झालेले पारायण यशस्वी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. उत्कृष्ट गवईकार म्हणून त्यांना विशेष मान मिळाला. गावातील पारंपरिक जाखडी नृत्य (बाळ्या डान्स) ही सांस्कृतिक परंपरा त्यांनी जिवंत ठेवली.
कुटुंबवत्सल व्यक्तिमत्व
आई-वडील हेच दैवत मानून त्यांनी मुंबईत नोकरीची संधी असूनही गावी राहणे पसंत केले. आपल्या आईवरील त्यांची अढळ श्रद्धा आणि कुटुंबासोबत जपलेले जिव्हाळ्याचे संबंध ही त्यांची खरी ओळख होती. त्यांच्या विनम्र स्वभावामुळे ते नातेवाईक व समाजात लोकप्रिय राहिले.
दुःखाचा सागर
हनुमंत दळवी यांच्या निधनाने देवळे विभाग, पोलादपूर तालुका व परिसर शोकमग्न झाला आहे. ग्रामस्थांनी त्यांच्या स्मरणार्थ मंदिरासमोर दीपमाळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांच्या उत्तरकार्य निमित्त गुरुवर्य रघुनाथ महाराज मोरे यांचे कीर्तन ठेवण्यात आले असून, हे उत्तरकार्य त्यांच्या राहत्या घरी, दाभिळ येथे दि. २५ सप्टेंबर रोजी होणार आहे.
त्यांच्या जाण्याने गावाला खऱ्या अर्थाने आधार देणारे, संघर्षशील व लोकहितवादी व्यक्तिमत्व हरपले आहे. समाजहितासाठी लढणारा हा लढवय्या कार्यकर्ता सर्वांच्या मनात कायम स्मरणात राहील.
Comments
Post a Comment